✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
चंद्रपूर:-दि. 11‘अल निनो’ च्या प्रभावामुळे यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा परिस्थितीत पावसाचे जास्तीत जास्त पाणी साठविणे, त्याचा उपयोग शिवारातील शेतीकरीता करणे, तसेच जमिनीची पाणी पातळी वाढविण्यास प्राधान्य देणे, आदी उपाययोजनांसाठी जलयुक्त शिवार अभियान 2.0 राबविण्यात येत आहे. शासन स्तरावरून याबाबत नियमित आढावा होत असल्याने या अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध यंत्रणांनी घेतलेली कामे त्वरीत पूर्ण करावीत, अशा सुचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अभियानातील प्रस्तावित कामांच्या प्रगतीचा आढावा घेतांना त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, उपवनसंरक्षक कुमारस्वामी, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, उपजिल्हाधिकारी (मनरेगा) शुभम दांडेकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा जलसंधारण अधिकारी निलिमा मंडपे, कार्यकारी अभियंता श्री. बेलपत्रे (ग्रामीण पाणी पुरवठा), आदी उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत उपविभागीय स्तरावर असलेल्या समितीची सर्व उपविभागीय अधिका-यांनी तात्काळ बैठक घ्यावी, असे सांगून जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, आपापल्या क्षेत्रात संबंधित यंत्रणांनी किती कामे घेतली आहे, त्यापैकी किती सुरू असून किती कामे पूर्ण झाली आहे. तसेच 100 टक्के कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा. जी कामे पूर्ण झाली आहेत, त्याचे पोर्टलवर नियमित मॅपिंग करावे. काम पूर्ण झाले, मात्र पोर्टलवर अपलोड न केल्यामुळे जिल्ह्याची आकडेवारी कमी दिसते. याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी.
👉जे कंत्राटदार काम करण्यास इच्छुक नाहीत किंवा टाळाटाळ करीत आहे, त्यांना सक्त ताकीद देऊन काम पूर्ण करून घ्या किंवा त्यांचे कंत्राट रद्द करा. ज्या कामांना प्रशासकीय मान्यता पाहिजे असल्यास तसा प्रस्ताव सादर करावा. आवश्यक कामे घ्यायची असेल तर ती त्वरीत घ्यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी पंत यांनी दिल्या. यावेळी त्यांनी महसूल, कृषी, वन, मृद व जलसंधारण, सिंचन, सामाजिक वनीकरण, मग्रारोहयो, ग्रामीण पाणी पुरवठा, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आदी विभागाच्या कामांची प्रगती जाणून घेतली.
💥जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामांची प्रगती- चंद्रपूर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 232 गावांची निवड करण्यात आली असून कामांची एकूण संख्या 3357 आहे. 232 गावांमध्ये 3099 कामे सुरू असून यापैकी 2918 कामे पूर्ण झाली आहेत. सुरू झालेल्या कामांची टक्केवारी 92.31 तर पूर्ण झालेल्या कामांची टक्केवारी 86.92 आहे.














