✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
चंद्रपूर :-देशातील विविध दहा कामगार संघटनांनी गुरुवार, दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या भारत बंद च्या हाकेला काँग्रेस पक्षाने जाहीर आणि संपूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या सूचनेनुसार हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. केंद्र सरकारने कामगार कायद्यात केलेल्या बदलांमुळे देशातील कामगार वर्गासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून त्यांच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. नव्या कायद्यांमुळे कामगारांच्या रोजगाराच्या संधी कमी होत असून त्यांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेवर परिणाम होत आहे. तसेच केंद्र सरकारची आर्थिक धोरणे ही कामगार आणि शेतकरी विरोधी असल्याची भूमिका काँग्रेसने स्पष्ट केली आहे.
दरम्यान, विविध शेतकरी संघटनांनीही या ‘भारत बंद’ला पाठिंबा दिला असून कामगार – शेतकरी एकजुटीचे हे आंदोलन अधिक व्यापक होणार असल्याचे चित्र आहे. मा. प्रांताध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशन च्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनी गुरुवार, १२ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या भारत बंद मध्ये सक्रिय सहभाग नोंदवून संपुर्ण पाठिंबा द्यावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी केले आहे. तसेच कामगार व शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करण्याचा निर्धार घेऊन जिल्हातील काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी भारत बंद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.








