✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
गडचांदूर :-कोरपना तालुक्यातील भोयगाव भारोसा शिव रस्त्यावरील भैरम वाळू घाट सध्या रॉयलटी(TP)च्या माध्यमातून मोकळा करण्यात आला आहे.हा घाट दोन तलाठ्यांच्या हद्दीत येतो.परंतू कवठाळा,भोयगाव परिसरातील काही रेती तस्कर तलाठी,अधिकाऱ्यांचे हात ओले करत एका टीपीवर पूर्ण दिवस रेती काढत असल्याचे आरोप होत असून अधिकारी आमच्या खिशात असल्याचेही रेती तस्कर बोलत असल्याची चर्चा आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,टीपी असलेल्यांना रेती देण्यासाठी भोयगाव,भारोसा रेती घाटावर 2 पटवारी 1 मंडळाधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली.टीपी धारक ट्रॅक्टर व्यवस्थितपणे रेती नेत आहे.मात्र,याठिकाणी भोयगाव,कवठाळा व परिसरातील काही सराईत रेती तस्करांचे 10 ते 12 ट्रॅक्टर विना टीपी व एका टीपीवर अनेक ट्रॅक्टर रेती,बिनधास्तपणे नेत असल्याची माहिती आहे.यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार होत असल्याची शंका असून असे असेल तर
⏭️”कुंपणच खातंय शेत? आणि तळे राखी तोच पाणी चाखी” ही म्हण या निमित्ताने सार्थ ठरत असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
👉दररोज त्याचत्या पटवाऱ्याची याठिकाणी नेमणूक केल्यामुळे, सराईत रेती तस्करांसोबत यांची जवळीक वाढली.परिणामी रेती तस्करीचा गोरखधंदा सुसाट वेगाने सुरू असल्याचे आरोप होताना दिसून येत आहेत.टीपीच्या नावाखाली येथे अनपेक्षितरीत्या मोठ्या प्रमाणात बेधडक रेती तस्करी सुरू असून नियमांना पायदळी तुडवले जात असल्याचे संतापजनक आरोप सुद्धा करण्यात येत आहे.येथे नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून दररोज नवनवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी,जेणेकरून या रेती घाटावर सुरू असलेल्या गैरप्रकारावर अंकुश लागेल,रेती तस्करांचा सुळसुळाट बंद होईल.अशी मागणी काही सुज्ज्ञ नागरिकांनी केली आहे.जिल्हाधिकारी,तहसिलदार,यांनी याकडे जातीने लक्ष्य देऊन सराईत रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.आता सदर प्रकरणी पुढे काही सकारात्मक घडेल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.








