शेतकऱ्यांच्या हितासाठी थेट दिल्ली दरबारी दाद मागणार – केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांची भेट घेणार.
✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
राजुरा :– कोरपणा तालुक्यातील भारतीय कापूस महामंडळाच्या (CCI) कापूस खरेदी प्रक्रियेत झाल्याचा आरोप असलेल्या कथित गैरव्यवहाराची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या कष्टाच्या कापसाच्या खरेदीत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झाला असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. CCI ही केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अखत्यारितील कापूस खरेदीची प्रमुख नोडल संस्था असून, किमान आधारभूत किंमत (MSP) व्यवस्थेअंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याची महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे खरेदी प्रक्रियेतील पारदर्शकता आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
कोरपणा तालुक्यातील CCI संदर्भातील तक्रारी आणि कथित अनियमिततेची स्वतंत्र, उच्चस्तरीय चौकशी करून संपूर्ण वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी सुभाषभाऊ धोटे करणार आहेत.

यासाठी संबंधित कागदपत्रे, शेतकऱ्यांच्या तक्रारी आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे केंद्र सरकारकडे हा विषय प्रभावीपणे मांडण्याचा त्यांचा निर्धार आहे. या गंभीर विषयाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सुभाषभाऊ धोटे दिल्ली येथे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांची भेट घेणार असून, कोरपणा तालुक्यातील CCI कापूस खरेदी प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांच्यासमोर मांडणार आहेत. तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वस्तुनिष्ठ चौकशी करून दोष आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे.शेतकरी हा आपल्या कृषी अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याच्या कष्टाने पिकवलेल्या कापसाच्या खरेदीमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा अन्याय झाला असेल, तर तो खपवून घेतला जाणार नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा प्रश्न सातत्याने लावून धरू, अशी आक्रमक भूमिका सुभाषभाऊ धोटे यांनी घेतली आहे.
दरम्यान, राज्यातील कापूस खरेदी व्यवस्थेबाबत यापूर्वीही विविध ठिकाणी अनियमिततेचे आरोप आणि चौकशीच्या मागण्या समोर आल्या आहेत. त्यामुळे कोरपणा तालुक्यातील तक्रारींचीही सक्षम यंत्रणेमार्फत वस्तुनिष्ठ चौकशी होणे आवश्यक असल्याची भूमिका शेतकरी व काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
कोरपणातील CCI प्रकरण दिल्लीपर्यंत नेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सुभाषभाऊ धोटे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आता या प्रकरणाला कोणते वळण देते, याकडे तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.












